सोमवार, २७ एप्रिल, २०२०
दरवळ
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
शेतकरी
पाचही बोटे सारखे नसतात (म्हण)
शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०
जमतंय का बघा
आयुष्याचे पुस्तक
गर्द काळोखात मनाच्या
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
भेटणे तुझे माझे
वाट शब्दांची
शब्दामृत
सफर
सोमवार, २० एप्रिल, २०२०
रविवार, १९ एप्रिल, २०२०
मी फसतो
सांज
शृंखला
ओसाड खेडे
सुर तू.,,
कविता
कविता
बोधकथा
बुधवार, १५ एप्रिल, २०२०
कविता
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
दलित साहित्य
दलित साहित्य प्रेरणा आणि विद्रोह बांधिलकीचा
दलित साहित्य मनोरंजनासाठी नाही. शोषीत समाजाला पारंपरिकतेच्या बंधनातून मूक्त करणे हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामूळे दलित साहित्यात भावनाभिव्यक्ती नाही तर विचार आहे. हे विचारच दलित साहित्यात भावनेचे रुप धारण करतात. दलित साहित्याच्या प्रेरणास्थानी तथागत गौतम बुध्द, म. ज्योतिराव फुले, कार्ल मार्क्स आणि मुख्यत्वे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत.
बौध्द विचार सामाजिक क्रांतीचा आणि परिवर्तनाचा विचार आहे. बौध्द तत्वज्ञानच बुध्दीवादावर व तर्कावर आधारित आहे. समता, व्यक्ती स्वातंत्र्य, अहिंसा, शांती आणि सत्य यांचाही ह्या तत्वज्ञानात सामावेश आहे.
कार्ल मार्क्सने समाजवादाचा पुरस्कार केला. साम्यवादामूळे स्त्री-पुरुषांना त्यांचा विकास साधता येतो. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. दलित साहित्यातून आढळून येणारा नकार आणि विद्रोह म्हणजे मार्क्सच्या आदर्श समाज व्यवस्थेच्या कल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी चालविलेल्या संघर्षाची प्रधान सूत्रे होय. दलित साहित्यात दारिद्रय , भूक , समाजव्यवस्थे विरुध्द बंडाची भाषा येते,याचे मूळ कारण डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली मार्क्स विचार सरणी होय. म. फुलेंनीही मानसिक व सामाजिक गुलामगिरी विरुध्द बंड केले.समता, बंधुता यांचा पुरस्कार केला. दलित साहित्य हे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, वर्ण, जाती व्यवस्था यांना नकार देते. हिंदू परंपरा, वाईट चालीरीती , यांच्या विरुध्द बंड पुकारते हा विचार डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीमधून आलेला आहे.
त्यांनी दलितांना बलुतेदारी सोडून स्वातंत्र्य जीवन जगण्याचा उपदेश केला. मानव मुक्ती, स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार केला. दलितांच्या मनात आत्मसन्मान , आत्मविश्वास, आत्मावलंबन यांची जानीव निर्माण करुन दिली.जो धर्म वर्तमान समृद्ध करण्यासाठी माणसाला प्रोत्साहन देतो, जो त्याच्या मनात आशा पल्लवीत करतो व फुलवितो तोच खरा धर्म. लोकशाही, समाजवाद, आणि बुध्दविचारप्रणाली हाच आंबेडकरी विचारांचा गाभा आहे. दलित साहित्यातून डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात येते. समाजसुधारनेसाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक स्तरावर परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे.या साठी सम्यक क्रांती व्हावी लागते. ती घडवायची असेल तर विद्रोहाची गरज आहे. म्हणून दलित साहित्यात विद्रोह येतो.मानवतेसाठीचा हा विद्रोह आहे दलित साहित्य अज्ञान , दारिद्रय , पिळवणूक यांना नकार देते. वर्णव्यवस्थेमध्ये, जातीव्यवस्थेमध्ये मानवी मूल्यांचे अवमूल्यन होते. म्हणून या साहित्याने वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नाकारली आणि माणूस महान आहे हे सूत्र स्वीकारले. ते माणसाला केंद्रबिंदू मानते, त्याची बांधिलकी मणुष्यत्वाची प्रतिष्ठा मानणाऱ्या तत्वप्रणालीशी आहे.
१९५८साली मुंबई येथे पहिले दलित साहित्य संमेलन भरले. त्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी 'हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे' असे विधान केले. याच संमेलनात मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात दलित लेखकांचे दलितांविषयीचे साहित्य यांचा दलित साहित्य म्हणून स्वतंत्र विभाग मानन्यात यावा असा ठराव पास करण्यात आला.
दलित शब्दाची व्युत्पत्ती
डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलित शब्दाची व्याख्या सर्वसमावेशक करणे फारसे योग्य ठरणार नाही. कारण दलित या शब्दामागे एक महत्वाची कल्पना आहे. हिंदू धर्माने आणि सामाजिक रुढींने ज्यांना आजवर बहिष्कृत मानले त्या माणसांना डाॕ. बाबासाहेबांच्या मुक्तीसंग्रामात नवी शक्ती लाभली आणि त्याला आपले मूल्यवान अनूभव व्यक्त करण्याची संधी लाभली. हा दलित वर्ग भारताचा पुराण, मूक, आणि अदृश्य पुरुष होता."
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात, "मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला , रेटलेला सामाजिक वर्ग म्हणजे दलित."
डाॕ. भालचंद्र फडके दलित साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते सर्वसमावेशक शोशीत समाज दलित म्हणता येणार नाही कारण भारताततील हिंदू संस्कृती व रुढी परंपरेमूळे, वर्णव्यवस्थेमूळे ज्यांना सामाजिक प्रगतीत मागे ठेवले गेले यात दलित या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मपरिवर्तन असेल किंवा काळाराम मंदिर प्रवेश चळवळ, महाडचा सत्याग्रह ह्या मानवी मुक्ती संग्रामातून ज्यांना शक्ती मिळाली. हा वर्ग जागृत झाला ज्यांना आत्मभान मिळाले ते दलित.
लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला वर्ग मग तो कोणी का असेना तो दलिता. पण याचा संदर्भही भारतीय समाज व्यवस्थे संदर्भातच घ्यावा लागेल.
जात्यात दळले गेलेले भरडलेले ते दळीत=दलित असाही अर्थ पाहवयास मिळतो. हे भरडणे दळणे भारतीय समाजव्यवस्थे संदर्भात घ्यावे लागते.
त्या संदर्भात लोकसाहित्याचे आभ्यासक डाॕ. प्रभाकर मांडे त्यांच्या 'दलित साहित्याचे निराळेपण' ह्या ग्रंथात सांगतात,"आपण येथे लक्षात घेतले पाहिजे की, दलित हा शब्द proletariat याचा अर्थ वर्ग वाचक किंवा केवळ जातीवाचकही नाही. दलित म्हणजे एक विशिष्ट सामाजिक स्थिती अनुभवित असलेला समूह किंवा समाजगट. भारतातील समाजव्यवस्थेत या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे."
तर डाॕ. गो. म. कुलकर्णी म्हणतात,"तळागाळात रुतून बसलेला सर्वच उपेक्षित समाज म्हणजे दलित समाज."
तर कवी नामदेव ढसाळ यांच्या मते, "दलित म्हणजे अनुसूचित जाती-जमाती, बौध्द, कष्टकरी जनता, कामगार, भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जमाती, आदिवासी इत्यादी."
नामदेव ढसाळ दलित ह्या संकल्पनेत सर्व शोषीत कामगार, शेतकरी, भटक्या जमाती , आदिवासी यांचा समावेश करतात.
दलित साहित्यात दलितांच्या जीवनाचे चित्रण येते . परंतु दलितांच्या जीवनाचे चित्रण आले म्हणून ते दलित साहित्य होईल का? तर साहित्याचे वेगळेपण व्यक्त होणाऱ्या जानीवेत असते.
दलित जाणिवा
डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलितेत्तर लेखक आणि दलित लेखक यांच्या अनुभव घेण्याच्या शक्तीतच फरक आहे. दलित्तेतरांचा अनुभव संकल्पनात्मक आहे, तर दलित लेखकांचा अनुभव संवेदनात्मक असतो. एखिदे नाटक वाचणे आणि तेच नाटक प्रयोग रुपात पाहणे यात फरक असतोच . तसेच दलित लेखकाचे लेखन हा एक जीवंत अनुभव आहे.दलितेतर लेखकांनी जे लिहिले ते तितके उत्कट नसणे, जीवंत नसणे स्वाभाविकच आहे. म्हणून दलित साहित्यात आकारास येते, ते दलित लेखकाचे जग .हे जग त्यांचे स्वतःचे आहे. ते त्यांनी भोगलेले आहे. त्या जगातच ते वाढले आहेत.दलित साहित्यातील वेगळेपणा आमूक एका जातीतील लेखकाने लिहिले यात नसतो किंवा समूहाचे जीवन निवडले यातही नसतो किंवा विशिष्ट पोज घेऊन लिहिले यातही नसतो, तर तो दलितपणा माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करण्यात आहे, त्याला महान म्हणण्यात आहे. वंश, वर्ण व जातिश्रेष्ठत्वाला कडाडून विरोध करण्यात आहे."
या संदर्भात शरदचंद्र मुक्तीबोध म्हणतात, " दलित असणे व दलित जाणीव असणे हे भिन्न आहे. दलित जानीवेतून दलित जीवनविषयक जे वाड्•मय निर्माण होते ते, दलित वाड्•मय."
ह्या बाबत प्रा. कुमुद पावडे यांचे मत ही विचारात घेण्यासारखे आहे. त्या म्हणतात," माणुसकीच्या जगात माणसालाच प्रथम स्थान आसावं. पक्षी,मुंग्या, किडे, मासे, साप इत्यादी करुणेचे विषय दलितांच्या नंतर असावेत. माणुसकीची जानीव विसरलेल्या प्रेरणा बेगडी व हस्यास्पद असतात."
दलित साहित्याचे स्वरुप: बांधिलकी
दुःखाची तीव्रता कितीही असली तरी दलित साहित्य आशावादी आहे. कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या सखीला केलेली मागणी याच उत्कट आशावादातून जन्म घेते.ते म्हणतात -
"याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
वेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजेच."
कुणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये. माणसाने माणसाला समानतेने वागवावे न्यायाने वागवावे. हिच ठाम अपेक्षा दलित साहित्यात प्रकट होते. नामदेव ढसाळ म्हणतात -
"माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्दवस्त करुन घ्यावे
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही
गुलाम करु नये लुटू नये
काळा गोरा म्हणू नये, तू ब्राम्हण तू क्षत्रिय
तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
नाती न मानण्याचा
आय भैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी
मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे.
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करडून खावा, माणसावरच सूक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने."
दया पवार म्हणतात -
"हे महाकवे ,
तुला महाकवी तरी कसे म्हणावे
हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा
एक जरी श्लोक तू रचला असतास....
....तर तुझे नाव काळजावर कोरुन ठेवले असते.
वरील काव्य रामायण महाकाव्य लिहीणा-या वाल्मिकी ऋषी बद्दल आहे.
अर्जुन डांगळे म्हणतात -
"जगत आहोत आम्ही इथे
जगावे लागते म्हणून
तर असे हे जिणे जगत असताना
ही महानगरी आमच्यावर खूष झाली
'बेकार' नावाची तिची प्रियतम
पदवी आम्हा बहाल केली."
वरील ओळीत सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कवीने मांडला आहे.
गावकुसाबाहेरच्या माणसांच्या वाट्याला आलेले दुःख वामन निंबाळकर व्यक्त करतात.
"या गावकुसाबाहेरचे वाळलेले
चिरडलेले जीवन,
विषय झालाच नाही ,
तुमच्या कवितेचा."
श्री. ज. वि. पवार यांच्या काव्यात डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
"तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडाविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास
उभा बहिष्कृत भारत
पण पवारांच्या कवितेला मार्क्स नको आहे आंबेडकर हवे आहेत ते म्हणतात -
"तू म्हणतोयस मार्क्स हा दवा आहे
मी म्हणतोय ती एक दारु आहे
ही जातीयता फोड. हे बांध फोड
बांधाबांधातील पाणी घुसू दे,
तुझ्या बांधात, माझ्या बांधात."
'दिशा' या कविता संग्रहात ज्योती लांजेवार यांनी स्त्री मनाचे चित्र रेखाटले आहे. स्त्रीयांवर होत असलेल्या आत्याचारांबाबत त्या म्हणतात -
"हे कृष्णा ...तुझ्या राज्यात
आया बहिणींवर अत्याचार
अन् तू डोळे मिटावेसे असे पार...
अरे, अंगभर वस्त्रे पुरवू नकोस
पण वस्त्र ओढणारे ते हात
मूळापासून छाटून तरी टाक!"
वरील सर्व काव्य लेखन पाहता हे लक्षात येते, दलित साहित्यात विद्रोह आहे पण तो माणुसकीचा हक्क मागण्यासाठी. दलित साहित्य हि एक चळवळ आहे. त्या चळवळीतून जो संस्कृती, वर्णव्यवस्था जातीयतेने हक्क हिरावून घेतलेला आहे. तो माणुसपणाचा हक्क सनदशीर मार्गाने मागण्यासाठी दलित साहित्य चळवळही हातभार लावते. सामाजिक बांधिलकी हा विद्रोह जपतो. पण आजही हे भेद आणि माणुसकी संपली आहे का असा प्रश्न मनात घर करुन जातो.
लेखन/संकलन
#सोमनाथ_पुरी
भीम जयंती
स्वातंत्र्य शब्दांचे
रविवार, १२ एप्रिल, २०२०
स्त्रीवादी लेख
ज्योती हनुमंत भारती यांच्या कवितेतील स्त्रीवाद
कविता हे देखील जीवितयात्रेतील पाथेय आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. आपण जे अनुभविले त्याचा आविष्कार कवितेतून करताना एक तृप्तता वाटते. स्त्रीने आपली सुखदुःखे, आशा-आकांक्षा व्यक्त केल्या त्या प्रथम कवितेतून. साने गुरुजी म्हणत की, स्त्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतला, तो कवितेतून, कविता ही तिची सखी. जात्यावर दळताना, कांडताना, झोपाळ्यावर झोके घेताना कविता हीच तिची सहचारी होती, तिचे विश्व होते, चूल आणि मूल, माहेर आणि सासर, या विश्वात तिच्या वाट्याला कधी वेदना आल्या, कधी श्रावण सरीचे सुख आले. जे वाट्याला आले ते तिने कवितेच्या करंड्यात जपले. ही 'अपौरुषेय' कविता म्हणजे मराठी कवितेचे धन. एका मर्यादित विश्वात वावरत असणाऱ्या स्त्रीची कविता चित्त वेधून घेते. याचे कारण तिचा जन्म तिच्या जगण्यातून झालेला आहे. तिच्या विविध भावस्थितीचे चित्र या कवितेतून उमटत गेलेले आहे. लग्न, मुंज, बारसे, डोहाळे अगर नागपंचमी, गौरी-गणपती, नवरात्र इ. सण व उत्सवांच्या निमित्ताने स्त्रीचे दुथडी भरून आलेले मन कवितेतूनच गोचर होते.
प्राचीन मराठी कवितेची वाटचाल महानूभाव पंथ, वारकरी संप्रदाय ह्या मध्ये पहावयास मिळते. मग तिथे महदंबा गोविंदप्रभूच्या भक्तित तल्लीन होऊन 'धवळे' रचते, तर जनाबाई विठ्ठलासाठी अभंग रचना करते.
असा स्त्रीयांनी लिहीलेल्या काव्याचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासून पहावयास मिळतो. तो अध्यात्माच्या रूपात.
कवितेची आणि स्त्री साहीत्य लेखनाची नाळ जोडणे ही पुरुषप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. स्त्रीयांनी नाजुक कोमल भावच काव्यातुन का जोपासावेत? असा आधुनिक स्त्रीवादी साहीत्य समीक्षेला पडलेला एक प्रश्न आहे. ह्यातच स्त्रियांचे भाव विश्व गुरफुटन टाकणे स्त्री साहित्याकडे मनोरंजक म्हणून पाहणे ह्या पलिकडे वाचक व समीक्षकाची दृष्टीच जात नाही.
कविता लिहीणा-या कवींनी ही बंधने झुगारून द्यायला पाहिजेत.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. हाच दृष्टिकोन स्त्री साहित्यातुन पाहवयास मिळतो. ह्या बाबत एडवीन आर्डनर म्हणतात, 'गुढ, अप्रकाशित, अंधाऱ्या अती खासगी विभागातून (wild zone) तिची कलात्मक निर्मिती होणे आवश्यक आहे. यातच तिचे खरे अस्तित्व असते. तेथिल भाषा, तेथून निर्माण होणारी प्रतिमा यांनीच खरी स्त्री साहित्याची वीण बांधली गेली पाहिजे. आपल्या साहित्यामध्ये अस्सलपणा पाहिजे असेल तर wild zone कडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही.'(संदर्भः साहित्य दर्शन -डाॕ. दिलीप गायकवाड )
ज्योती हनुमंत भारती ह्यांच्या काव्यातील स्त्रीवाद
ज्योती भारती ह्या कवयित्री मराठी कविता तसेच हिंदी भाषेतही काव्य लेखन करतात. त्यांच्या काव्य लेखना मागील प्रेरणा ज्ञानपीठ विजेत्या पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम असल्याचे सांगतात. शालेय जीवनापासूनच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला.
त्यांच्या मराठी कविता वाचकाच्या हृदयाला भीडतात.
त्यांच्या कवितांचा विषय प्रामुख्याने प्रेम भाव असला तरी त्यांच्या कवितातून सामाजिक जानीवही येते. पौराणिक राधा-कृष्ण, सीता, दुर्गा, चंडी, शिव अशा प्रतिकातून त्यांची कविता व्यक्त होत जाते.
राधाकृष्णातील आध्यात्मिक पातळीवरील समर्पन भाव त्यांच्या काव्यात पाहवयास मिळतो. त्या त्यांच्या एका काव्यात म्हणतात -
'राधा झाली कृष्ण
कृष्ण झाला राधा
कोणी कशी वर्णावी
ही सावळ्याची बाधा'
अशा प्रकारे राधाकृष्णातील अद्वैत भावाचा अपूर्व संगम घेऊन त्यांची प्रेम कविता अवतरते. अशा प्रकारचा अध्यात्मिक संदर्भ देणारी कविता इंदीरा संतांचीही पहावयास मिळते. येथे इंदीरा संतांशी तुलना करण्याचे कारण आध्यात्मिक प्रतिमांच्या साह्याने कविता लेखन करुन प्रथम इंदीरा संतांनी पारंपरिक काव्याचे वर्तुळ भेदले होते. तीच पुनरावृत्ती आजही होताना पाहवयास मिळते. त्या म्हणतात,
'अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकूळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ'
- इंदीरा संत(मृगजळ)
इंदीरा संत सांगतात 'मी मृगजळ ह्या काव्य संग्रहात मुक्तछंदाचा अधिक आश्रय घेतला, (छंदाचे हे वर्तुळ अगोदरच मुक्तेश्वराने भेदले होते.) कारण जशा भाव जानीवा संमिश्र, क्षोभकारक व सूक्ष्म होत जातील, तशी त्यांना ओवी व पादाकुलक ही वृत्ते मानवत नाहीत, असे मला दिसून आले.'
ज्योती भारती यांच्या काव्यातही वृत्त व छंदाचा जास्त वापर होत नाही. म्हणून ती काव्यलेखनाची काही मर्यादा नाही तर जिथे भावना तीव्र असतात तिथे वृत्ताच्या नियमांची गरजच काय? त्यांच्या काव्यातील भावच श्रेष्ठ ठरतात. अस्सल काव्याचा दर्जा त्या काव्याची वृत्तीच त्यांना बहाल करते.
दुसरी महत्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे परंपरेनूसार स्त्रियांच्या भावभावना जशाचतशा प्रकट करणे हे सुध्दा पुरुषी वर्चस्व असणाऱ्या समाजात धाडसाचे काम आहे. ह्या बाबतीत लक्ष्मी बाई टिळकांचे अनुभव
एकदा त्यांनी कविता लिहिली व त्यांचे पति रागावतील म्हणून त्यांनी कागद चोळामोळा करून टाकला. टिळकांना वाटले ही आपल्या माघारी माहेरी पत्र लिहीत आहे पण टिळकांना ती कविता सापडली. १८९५ मध्ये टिळकांनी धर्मांतर केले. विचित्र परिस्थितीने घेरलेले त्यांचे मन कवितेला 'दुतिका' म्हणून संबोधू लागले. पति विरहामूळे एकटेपण आलेल्या लक्ष्मीबाईंचा विरहात कविता हाच विसावा होता.
ज्योती भारती यांच्या कविता त्यामानाने स्त्री मनातील भाव निर्भिडपणे व्यक्त करतात. हे ही त्यांचे सामर्थ्य स्थानच आहे.
त्यांची सखीला उद्देशून लिहीलेली एक कविता स्त्रिवादी साहित्याचा जणू आत्माच आहे. ती कविता 'नारी तू जगतेस का?' ह्या काव्यात म्हणतात -
'स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
रोज निरंतर झूलतेस का?
लावून उपाध्या नात्यांच्या
बाईपणात मिरवतेस का?
आब राखत चालतानाही
नारी तू तुझी उरतेस का?
खरंच तू जगतेस का?'
ह्या ओळी सखीलाच नाही तर पुरुषांनाही विचार करण्यास प्रवृत्त करतात. जगणे म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, बंगला, गाडी, सुंदर कपडे, मेकप म्हणजे जगणे का? पुरुषसत्ताक कुटुंब पध्दतीमध्ये पतिला ईश्वर मानले जाते, मग तो कसा का असेना. ह्यालाच संस्कार आणि संस्कृती म्हणतात मग ती ही कशी का असेना. पण स्त्रिवादी साहित्याला ह्या मर्यादा , वर्तुळे भेदण्याची गरज आहे. स्त्रियांच्या मनातील हळूवार भावभावनांचा आजही सुशिक्षित घरातही विचार केला जात नाही. एवढेच नाही तर स्त्रीच संस्काराचा बुरखा घेऊन ह्या भावना लपवत असतात.
तेच साहित्याच्या बाबतही लागू होते. एका हाडा मासाच्या शरीरात श्वास घेणे व सोडणे एवढीच क्रिया चालू राहते. स्वप्ने पाहण्यावरही पाप पुण्याचे बंधन येते.
कवयित्री म्हणतात केंव्हा ही स्त्री आई असते , केंव्हा बहिण, केंव्हा सून, एवढेच नाही तर प्रेयसी सुध्दा हे सर्व बंधनाचे नाते घेऊन ती जीवनाचा गाडा ओढत असते. नात्यांचा सांस्कृतिक धर्म पाळीत असते पण जगत नसते. नेमक्या ह्याच प्रश्नाला कवयित्री येथे वाचा फोडतात. हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.
पुढे त्या म्हणतात -
स्वत्व तुझं शोधताना नव्याने
एखाद्या वर्तुळा बाहेर पडतेस का?
वारसा घेतेस अजूनही सीतेचा
पण मनात राधा जपतेस का?'
कवयित्री सखीला स्वत्व शोधताना एखाद्या वर्तुळाबाहेर पडतेस का? असा प्रश्न करतात. मग ही वर्तुळे कुठली आणि कोणती? तर संस्कृती, संस्कार आपण ज्यांना म्हणतो त्यात दोष निर्माण झाल्यामूळे तिच आपली साखळदंड ठरतात. दुसरा मुद्दा आहे साहित्याच्या बाबतीत स्त्रीयांची कविता त्याच पारंपरिक वर्तुळामध्ये घुटमळत राहते. हे वर्तुळ भेदण्याची क्षमता आधुनिक काळात निर्माण झाली पाहिजे.
कवयित्री सौ. पद्मा गोळे त्यांच्या नीहार ह्या काव्यसंग्रहात 'मी माणूस' कवितेत म्हणतात.
"स्री देवी हे तर खोटं
स्त्री सखी हे ही खोटं
स्त्री सुंदर चलनी हुंडी
स्त्री म्हणजे नुसती कुंडी
स्त्री म्हणजे केवळ मांस
शिका-याच्या हातात फास (नीहार पृ. ३५)
बाकी सारे मोहक भास"
स्त्री ही माणूस आहे आणि ती माणूस म्हणूनच जगणार हा विचार पद्माताईंनी आत्मविश्वासाने मांडला.
स्त्रीला संसारात स्थान काय? ती पतिची प्रिय सखी की शोभेची वस्तू ? प्रीती विसरणा-या प्रियकराला ती सांगते ः
"विसरलास तू अन मी झाले
रे केवळ गृह मंदिरभूषा."(नीहार पृ. २५)
अशा प्रकारच्या विषयावर लेखन फार कमी आढळते. स्त्री जीवनात ही वैफल्य आहेत तर साहित्यातही निर्भिडपणे यायला पाहिजेत. असे वर्तुळ भेदून कविता पुढे गेली पाहिजे. ज्योती भारती यांच्या कवितेत हा उपदेश येतो.
त्या स्त्रीला म्हणतात, तू सीतेचे पतिव्रत्य जपतेस पण कधी काळी तुझ्या मनात प्रियकराबद्दल असक्ती निर्माण झाली तर ती 'राधा' राधेचा भाव मूक्तपणे जपतेस का? का तुला ते संस्कारामूळे पाप, चुकीचे वाटते?असे प्रश्न वरील ओळीतून केले आहेत.
कविता आणि स्त्री हे नाते पुरुष प्रधान संस्कृतीने मोठ्या सीताफिने जोडले आहे. आणि स्त्रिया ही हेच वर्तुळ आनंदाने गिरवताना दिसतात. ह्या वर्तुळाला भेदण्याचे सामर्थ्य साहित्यात येणे आवश्यक आहे.
ज्योती भारती पुढे म्हणतात,
लावून झापडं करिअरची
पुरूषी अहं मिरवतेस का?
साज नवाच चढवून तोंडावर
आतली रंभा पुसतेस का?
आधुनिक स्त्री ध्येय, करिअरच्या नावाखाली पुरुष होतेय का? ही सुध्दा भिती येथे कवयित्री व्यक्त करतात. ही तर भविष्याची चाहूल आहे. कदाचित वर्तमान सुध्दा असेल. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी नव्हत्या त्यावेळेस त्या पुरुषप्रधान संस्कृतीत गुलाम होत्या किंवा आहेत. पण आर्थिक स्वावलंबन आल्यास परत ती पुरुषांवर वर्चस्व गाजवायला पाहतेय का? असाही प्रश्न त्यांची कविता विचारते. स्त्री-पुरुष समानता किंवा स्त्रीवाद हा पुरुष विरोधी नाही तर स्त्रियांचे दास्यत्व झुगारुन नवी समाज रचना अस्तित्वात आणन्यासाठीचा आहे. तेथे स्त्री पुरुष सर्व पातळ्यांवर समान असतील.
पुढच्या ओळीत परत त्या म्हणतात, नवा साज चढवून श्रृंगार करुन. हे सौंदर्य केवळ बाह्य दिखाव्यासाठी करतेस का खरंच तुझ्या मनातील भावसौंदर्यही तु जपतेस? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने मिळवावे. त्यांची कविता प्रश्न विचारुन मनात घर करते.
सीता, राधा, रंभा हे पौराणिक संदर्भ देण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्व आहे.
आईपणाने सर्जक होताना
वेणा सोसत लढतेस का?
दुनिये भोवती फिरता फिरता
स्वतःलाही शोधतेस का?
कवयित्री म्हणतात, तुला निसर्गाने आई होण्याचे वरदान दिलेय. आई होताना तुझी कुस सर्जनशीलता दाखवते पण प्रसुतीच्या वेदना सहन करतेस तशा संसारातील वेदनाही आईपणाने सहन करतेस. एवढा त्याग करुनही कधी दुनियाही तू पाहतेस पण कधी अंतर्मुख होऊन तुझे स्वतःचे सुख कशात आहे हे शोधतेस का?
थोडक्यात सांगायचे झाले तर स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टीकोणातून सुरुवातीला लेखन करणाऱ्या स्त्रियांनी अध्यात्माची कास धरली पुढे स्वातंत्र्याअगोदर व नंतर कविता अंतर्मुख होऊन तिने स्त्री मनातील विविध भावनांचे पदर उलगडायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रेमानुभवाचे तसेच मनातील कोलाहल जी स्त्रित्वामूळे निर्माण झाली ती मुक्त पणे कवितेत व्यक्त केली इंदीरा संत व पद्मा गोळे ह्या कवयित्रींच्या काव्यात ती पाहवयास मिळते. सध्याच्या वर्तमानकाळात कविता अधिक स्पष्टपणे भाव मांडते. हे ज्योती हनुमंत भारती यांच्या प्रातिनिधीक काव्यात दिसून येते.
ह्या ही पुढे जाऊन सध्याचे वर्तुळही कवितेला भेदण्याची गरज आहे.
म्हणून म्हणावेसे वाटते,
हम जींदगी लिखते है कलमसे
इसलीऐ के बंदगी खत्म हो जींदगीसे
#सोमनाथ_पुरी