सोमवार, २७ एप्रिल, २०२०

जीर्ण

दरवळ

अंगणातल्या प्राजक्त फुलांचा
सुगंध अजून दरवळत येतो
मावळत्या संधी प्रकाशात
मनात चांदणे फुलवून जातो

दिवसरात्रीचे असते अतुट नाते
कातरवेळ मनात व्याकूळ होते
जीव खाते निःशब्द असे असणे
मन संध्येला शब्दांत व्यक्त होते

- सोमनाथ पुरी

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

शेतकरी

#शेतकरी

बाप शेतकरी माझा
मोती पिकवी रानातं
जीर्ण रगताचे थेंबं
घाम गाळीतो शेतातं

                         पाणी जातं कधी येतं
                         तरी पेरीतोच बापं
                         मनं कधी न हारतं
                         सदा राबतोच बापं

कधी पेरणीला कर्ज
कधी सरकारी अर्ज
फे-यामधी नशिबाच्या
नीभावीतो सारे फर्ज

                           पोरं शिकण्याला दामं
                           नव्हं कधी घडं त्याला
                           पुन्हा कर्जाचा रगडा
                           बार बार नशिबाला

पोरं न्हातीधुती होते
हुंडा पाहूणा मागतो
उरी कर्जाचा डोंगरं
बापं अजन्म फेडीतो

#सोमनाथ_पुरी

पाचही बोटे सारखे नसतात (म्हण)

*****एक म्हण******

"पाचही बोटे सारखे नसतात."

 म्हणी अनुभवाच्या खाणी असे म्हणी बाबत म्हटले जाते ते काही खोटे नाही. याचा अर्थ म्हण समाज जीवनातून सहजपणे निर्माण झालेली नसते. एक तर ज्याच्या अनुभवातून म्हणीचा उगम होतो. ह्या अनुभवामागे त्याचे वैयक्तिक चिंतन तर असतेच पण ह्याला पाठबळ मिळते ते इतरांच्या अनुभवातून आणि म्हण प्रचलित होते. अशी म्हणीची निर्मिती सामाजिक स्वरुपाची सांगता येईल.
    'पाचही बोटे सारखे नसतात,' ह्या  म्हणीचा अर्थाच्या दृष्टीकोनातून जर विचार केला तर सर्व व्यक्तिमत्व सारखे नसतात, असा अर्थ आपण सहज सांगत असतो.
पण ही म्हण निर्माण होण्यामागे अनुभवाची किती सखोलता आणि चिंतनही असते, ह्याचा म्हणीचा वापरकर्ता कधी कधी विचारही करत नाही. कधी तर चुकीच्या ठिकाणी म्हण वापरुन आपले नाकर्तेपणावर पांघरूण घातल्या जाते.
   उदा. एखाद्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांना न शिकवीता वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे.  निकाल तयार करणे आणि एखाद्या पालकाने विचारले माझा मूलगा वर्गात एवढ्या कमी स्थानावर किंवा मागे का आहे? अशा ठिकाणी 'पाचही बोटे सारखे नसतात.' म्हणून तुमचा मूलगा मागे असा म्हणीचा वापर करणे यथोचित ठरणार नाही. कारण विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी  शिक्षकांनी प्रयत्नच केलेले नसतात. म्हण मात्र अनुभवातून तयार झालेली असते. अशा मौल्यवान साहित्याची आपण त्याठिकाणी पायमल्ली करत असतो.
     एखाद्या शास्त्रज्ञाने त्याचे पूर्ण जीवन एखादे  अनवस्त्र तयार करण्यासाठी घालवावे, त्याने मानवी कल्याणाचा विचार करून अनवस्त्र तयार करावे व एखाद्या माथेफिरु राष्ट्राध्यक्षाने ते अनवस्त्र सहज एखाद्या देशावर टाकावे. ही शास्त्रज्ञाच्या विचार, त्याग, श्रम व ज्ञानाची हार असते.
   सृजनशील कलावंत असतील, शास्त्रज्ञ असतील ह्यांनी तयार केलेल्या कलाकृतीमागे खूप मेहनत चिंतन व अनुभव असतात पण वापरकर्त्याजवळ त्याचे ज्ञान असेलच असे नाही, ज्ञानाअभावी 'माकडाच्या हाती मशाल.' देण्यासारखी कृती अजानतेपणी घडत जाते. अशावेळेस कलाकृती व विचारांची हार होते.

   थोडक्यात, म्हणीचा योग्य अर्थ असा की अनेक व्यक्तींत सुधारणा करण्याचा प्रयत्न करुन तुम्हाला समोरच्या काही व्यक्तीत अपेक्षित बदल घडून आलेला दिसला पण एखाद्या व्यक्तीत त्याचा प्रभाव शून्य असेल तर "पाचही बोटे सारखे नसतात." असे आपण व्यक्ती तितक्या प्रकृतीचे वर्णन करताना म्हणू शकतो.

- सोमनाथ पुरी
   

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

जमतंय का बघा


मनातील भावनांना
कागदावर उतरवणे
कागदावरील शब्दांना
मधूर आवाजात गुनगुनने -जमतंय का बघा

खूप चिंतन केल्यानंतर
चिंतनातील आशय टिपणे
को-या कागदावर लिहून 
भाव काव्यात गुंफणे - जमतंय का बघा

एखाद्याचे दुःख पाहून 
थोडेसे व्याकूळ होणे
व्याकूळ मनालाही
फुल होऊन फुलवणे - जमतंय का बघा

जमलेच तर कोणावर तरी
निस्सीम प्रेम करणे त्या
प्रेमाला मनातून खुलवणे
स्मृतींना आयुष्यभर जपणे - जमतंय का बघा

विश्वाचा ठाव घेताना
स्वःतील माणूस जपणे
यशापयश पचवूनही
मनी उत्साह टिकवणे - जमतंय का बघा

कितीही संकटे आली तरी
जीवनाचा आनंद घेणे
गरजूंना थोडी मदत 
सांत्वन करत राहणे - जमतंय का बघा
- सोमनाथ पुरी    

आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक सामावून घेते, सा-या आठवणी, 
बालपणीचा काळ सुखाचा, आठवून येतो प्रौढपणी.

शाळेत ठेवलेले पहिले पाऊल, दांडी मारुन घरी येते,
खोटी कारणे सांगून आईलाही, थोडे वेड्यात काढते.

वाढता इयत्ता किशोर अवस्था, मित्राचे बंध वाढत जाते,
दहावीच्या परीक्षेत काॕपी बहादरांची मोठी धांदल उडते.

मनावर तान अभ्यासाचा घेऊन, मग बारावीचे वर्ष येते,
ध्येय काय कळत नाही, पण लोंढा तिकडे मन धावते.

पदवीच्या वर्षात भारावलेले डोके, ध्येयाने पेटून उठते,
पुस्तक पराड अभ्यासू मन, मग थोडे पुस्तकात शिरते.

- सोमनाथ पुरी

गर्द काळोखात मनाच्या

  
गर्द काळोखात मनाच्या
प्रकाश आहे पुस्तकांचा
असतो एकटाच तेंव्हा
जीवलग मित्र एकांताचा

अंधःकार दाटून येता
दीपस्तंभ होते ज्ञानाचा
अपयशाने खचून जाता
उत्साह मिळतो यशाचा

कोणतीही असो परीक्षा 
साथ तुझी अशीच लाभो
वाट हरवली मध्येच तर
पांथस्था परी संग लाभो

सत्य सांगतो एकच साथी
पुस्तक माझे होतो सारथी
रणभूमीवर आयुष्याच्या
शस्त्र घेतो पुस्तक हाती

- सोमनाथ पुरी

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

भेटणे तुझे माझे

भेटणे तुझे माझे, हा एक योगायोग जीवनातला
योगायोगानेच चाफा फुलवलास,माझ्या मनातला

फुले असतात नाजूक, कोमेजून नष्ट होण्यासाठी
आठवणीचा कहर कुठे संपतो, जीवंत ह्या हृदयातला

क्षणोक्षणी फुलवायला आवडते, तुला शब्दांत विश्व
मला कुठे गवसतात शब्द, प्रत्येक क्षणाला फुलवायला

तासंतास जातात निःशब्द, मनात मात्र आभाळ असते
सुचल्यावर शब्दांत येतोच की, भाव आपल्या मनातला

तू राधा होऊन बरसतेस, श्रावणातल्या सरीसारखी
मनात भिजत जातो, मग कृष्ण होऊन त्या वृंदावनातला

@ सोमनाथ पुरी

वाट शब्दांची

वाट शब्दांची मनात
शब्द येती विचारात
शब्द असतात भाव
ठाव आपल्या मनात

शब्द पेटवती मने
शब्द जाळती घरे
करी दुःखाचे सांत्वन
शब्द ज्ञानाची भांडारे

शब्द असतात वाट
अभिव्यक्ती रुपी साज
शब्दातच दाटती नभ
शब्द शैलीचे ही बाज

प्रोत्साहन शब्द देती
शब्दामूळे मनी भीती 
पुस्तकात शब्द येती
शब्द बुध्दीलाही गती

सोमनाथ पुरी






शब्दामृत

                     शब्दामृत
घुमटावरती झेंडा फडकतो, आकाश सावळे वरी
कळसावरच्या रंग छटांचे, तिरीप माझ्या अंतरी
मंद दिव्याचे तेज झळकते, मूर्ती उभी सावळी
घंटा नाद गाभा-यातला घुमे नदी, डोंगर कपारी

जन्म मृत्यूच्या फे-यावरती दृष्टी, चंद्र माथ्यावरी
धूप चंदणी सुगंध दरवळे, शब्द अमृताचे कानी
समर्पनाचे तप अंगी, शिवलीला पार्वतीच्या मनी
तनमनाच्या एक बंधनी, शोभे नटवेश्वरअर्धांगिनी


 - सोमनाथ पुरी

सफर

सफर के हमराही तुम्हें दिल कहूं, या दिमाग कहूं
तुमने जो दिया उसे, वफा कहूं या बेवफाई कहूं

तुम ही बताओं जो, नही थी मंजील हमारी
इस इश्क के सफर  में, क्यों संग थी तुम्हारी

बिना वादें करके तुमने रस्म भी निभाई
जानाही था एक दिन तो, काहे नज्म़ बुनाई

खयालों में रहते हों, फिर भी दिल नें चोट खायी
अपने ना होतें हूए, धूप में इश्क की रित निभायी

जाते जाते क्यां कहूं, हमने सहि पहली दफा
दुनिया कोरोनासे लतफत, हमें इश्क की महामारी

रविवार, १९ एप्रिल, २०२०

मी फसतो

काहीतरी लिहून कधी कधी मी फसतो
जे लिहिलय त्याचाच विचार करीत बसतो

कधी मनातले तर कधी ध्यानातले लिहीत असतो
आणि कधी कधी तर कशातलेच लिहीत नसतो

लिहीणे माझे कर्म मी समजतो, ते करीत असतो
कशाचा शाप का हा व्याप शब्द उगाळत बसतो.

लिहीण्याचेही व्यसन, मनाला लावून मी घेतो
काम धंदे सोडून , लिहीण्यातच हरवून बसतो.

लिहीले नाहीतर,जगात नसल्यासारखा वाटतो
मेंदूला थोडासा खुराक द्यावा म्हणून लिहीतो.

सोमनातब पुरी

सांज

सांज
शब्दांनाही कधीतरी सुरुंग तो लागतो
गर्द काळ्या गाभा-यातला भावही दाटतो
लाटांची घुसमटही खडक भिजवीत येते
मना मधल्या अंधाराला ओली वाट दिसते

तांबूसल्या आकाशात काळोखही पसरतो
प्रकाशल्या दिवसाला, अंधकारही गिळतो
शुभ्र चांदण्याची चमक, ढगां आड दडते
हलकेच चंद्रकोर उगवणे नभाखाली घडते

सोमनाथ पुरी

शृंखला



मनातल्या त्या शृंखला
वेदनाही तुला देती
स्वः चा लढा जिंकून तू
पाड मनातल्या भिंती 

बंध जन्मोजन्मीचे हे
तोड गुलामीचे फास
मुक्त जगणे सौख्याचे
वास्तवात जग ध्यास

सोमनाथ पुरी

ओसाड खेडे

ओसाड खेडे
ओसाड झालेत खेडे आता
माणसाची मनेही फाटलेत
जिथे होता आनंद सदाचा
शेतातले धुरेही तुटलेत

पहात होतो येता जाता
आनंदात कुणबी राबताना
त्याच्या भाळी आट्या आता
होत नाही उलगडा जाताना

जगतात सारे अन्न खाऊन
जातात मातीला लाथाडून
धनासाठी मरतात रोज
निती नियम बाजूला ठेऊन

स्वर्ग होता केळीच्या बागेत
आंब्याच्या अमराईत अमृत
झाडा वरती पक्षी आनंदी
स्वर्ग होता हिरव्या शिवारात

शेतासाठी भावांत भांडण
कोर्टात येते नात्याला आदण
श्रम नको वाटतात आता
वेड लावी पैशाचे गोंदण

सोमनाथ पुरी



सुर तू.,,

सुर तू ....
किती अधीर होते ते क्षण
प्राजक्तांनी फुललेले अंगण
आता सारे फुल कोमेजतात
घालताना अबोल्याचे बंधन

अंगणाला शोभा रांघोळीची
रांघोळीतील त्या चाफ्याची
तुळशीची पानगळ दुःखद
नयनांना आवड हिरवळीची

तुळशीत असलेला कृष्ण
राधेच्या मनात खटकतो
आणि विनाकारण राधेचा
सवती मत्सर जागा होतो

गोपिकाही अतुर असतात
सावळ्याची खोड काढण्या
वृंदावनी ही सोहळे रंगतात
मुरलीचे मधुर सुर ऐकण्या

सजलेल्या अंगणाला पाहून 
राधा ही मनोमन मोहरते
सोहळ्याला साद देऊन
दोघांची प्रीत अमर करते

सोमनाथ पुरी

कविता

तुझ्यातली रणरागीणी जागी होते तेंव्हा
गळून पडतात दुष्टांचे मनोधैर्य
शब्दांत बारुद भरलेली चंडीका
तुझे रुप होईल असंख्य अबलांची सावली
रक्तबंबाळ झालेल्या मनातील
तुझे हेच अस्त्र आणि शस्त्र आहेत
विसर पडू नको देऊ
तुझ्या ह्या ही रुपाला
चिरडून टाक असेच 
अन्यायाच्या रोगाला

मग ते समाजातील असतील
किंवा समाज माध्यमांतील
असूरी प्रवृत्तींचा माज उतरवण्या
तुझी लेखानीच पुरेशी असेल...

सोमनाथ पुरी

कविता

दगड 
एकदा सिमेंट भिजलं की
दगड होतं कालांतरानं
माझ्या मनाचाही दगड
झालाय पहिल्या पावसानं

आता पाऊस आला तरीही
मन अजून पक्क होतं अन
पडनारं पाणी चिंब करण्या
अगोदर त्यावरुन वाहून जातं

चकाकतं दगडासारखं
ओल असे पर्यंत 
पुन्हा तापत राहतं
ऊन जाईपर्यंत 

सोमनाथ पुरी

बोधकथा

बोधकथा : माकड आणि मदारी

एका गावात एक मदारी रहात होता. तो दररोज माकडाचा गावोगावी जाऊन माकडाचा खेळ करायचा. त्याच्या डमरुच्या तालावर माकड मनेल तसे उड्या मारायचे. हा खेळ लोकांना खूप आवडायचा. त्याच्या खेळाच्या कौशल्यामूळे तो पंचक्रोशीत खूपच लोकप्रिय झाला. तो खेळ करुन जमा केलेल्या पैशात आपल्या गरजा भागवायचा.
  असे खेळ करता करता बरीच वर्षे निघून गेली. त्याच्या वया बरोबरच माकडाचेही वय वाढत होते. तो माकडाची खूप काळजी घ्यायचा. सहाजीकच त्या माकडाला वाटायचे इतर माकडापेक्षा आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपला मालक आपल्याला हवे ते खायला आणून देतो. ऊन पावसातही आपली काळजी घेतो. पण माकडाचे वय जसजसे वाढत गेले तसतसे मालकाला काळजी लागली. आता आपले माकड म्हातारे झाले आहे. पहिल्या सारखे खेळही त्याला जमत नाहीत, आणि त्याचे वय झाल्यामूळे त्याच्यात पहिल्या सारखा उत्साहपण राहिला नाही. मग ह्या माकडाला बाजारात विकून आपण नवीन माकड विकत घ्यावे अशी त्याच्या मनात कल्पना आली. 
      एके दिवाशी सकाळी उठून मदारी माकडाला घेऊन जात होता. माकडाला वाटले नवीन ठिकाणी खेळ करायला मालक आपल्याला घेऊन जात आहे. माकडाचा बाजारात जास्त पैसा यावा म्हणून मालकाने त्याला चांगले स्वच्छ केले होते. माकडालाही वाटले मालक आपली फारच काळजी घेत असतो. ह्या उपकाराने माकडाच्या डोळ्यात पाणी आले. 
   माकड आणि मालक जसजसे चालत होते. तसतसे रस्त्याने अनेक प्राणी व त्यांची मालके माकडाला दिसत होती. क्षणात माकडाच्या मनात विचार आला आपला मालक आपल्याला बाजारात तर घेऊन जात नसेल ना. ज्याची कल्पना केली तेच झाले. मदारी जनावरांच्या बाजारात माकडाला घेऊन गेला. 
       एका वट्यावर माकडाला बसवून मदारी ग्राहकाची वाट पहात होता. काही ग्राहक यायचे माकडाला खालून वरुन पहायचे व निघून जायचे. हे पाहून माकडाच्या डोळ्यात पाणी आले. इतके दिवस आपण मालकाची सेवा केली, तो म्हणेल तशा उड्या मारल्या, दोन पायावर उभे राहून कसरती केल्या. आज आपण म्हातारे झालो म्हणून मालक आपल्याला विकत आहे. माकडाला खूप वाईट वाटले.
       ग्राहक लागत नाही पाहून मदारीही वैतागला होता. माकडाला मारुन, शिव्या देऊन त्याचा राग तो काढत होता. मालकाला खूपच वाईट वाटत होते. एक ग्राहक शेवटी मिळाले. माकडाला काही रक्कम देऊन घेऊन जाण्यासाठी मदारी व ग्राहकाचा करार झिला. मालकाने त्या ग्राहकाकडे माकडाला सोपवले. ग्राहक मारत होता. माकडाच्या डोळ्यात पाणी आले. मदारी माकडाच्या मोबदल्यात मिळालेल्या नोटा मोजत होता व खूष होत होता पण त्याने माकडाकडे एकदाही वळून पाहिले नाही. माकडाच्या डोळ्यातून टपटप पाणी वहात होते. नवीन मालकाच्या मागे ते मजबुरीने चालत जात होते. मदा-याचा चेहरा आता मालकाला दिसेनासा झाला. माकड मात्र चालत राहिले....चालत राहिले,....!

तात्पर्य: लोभी माणसे स्वार्थासाठी निष्पाप प्राण्याचा वापर करतात व स्वार्थ पूर्ण होताच त्या प्राण्याला दूर करतात.

#सोमनाथ पुरी

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

कविता

चातक

मावळना-या सूर्याला मी चांदणे मागत होतो
मिटवून डोळे जराशे, तुझे स्वप्न पाहत होतो

फुललेल्या रात्रांचे चंद्र सुख कुठे आता
दुपारच्या उन्हातला विरह भोगत होतो

येशील प्रिये म्हणून मी दिवा तो पेटवला
दिव्याच्या ज्योतीची ती आग सोसत होतो

विझेल कधी हा वनवा, जंगलात पेटलेला
गर्द वनराईत, उभा वृक्ष होऊन जळत होतो

आशावादी मनाला, पहिल्या पावसाची ओढ
तहानलेल्या मनाचा, चातक होऊन जगत होतो

- सोमनाथ पुरी

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

दलित साहित्य

दलित साहित्य प्रेरणा आणि विद्रोह बांधिलकीचा

दलित साहित्य मनोरंजनासाठी नाही. शोषीत समाजाला पारंपरिकतेच्या बंधनातून मूक्त करणे हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामूळे दलित साहित्यात भावनाभिव्यक्ती नाही तर विचार आहे. हे विचारच दलित साहित्यात भावनेचे रुप धारण करतात. दलित साहित्याच्या प्रेरणास्थानी तथागत गौतम बुध्द, म. ज्योतिराव फुले, कार्ल मार्क्स आणि मुख्यत्वे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत.
    बौध्द विचार सामाजिक क्रांतीचा आणि परिवर्तनाचा विचार आहे. बौध्द तत्वज्ञानच बुध्दीवादावर व तर्कावर आधारित आहे. समता, व्यक्ती स्वातंत्र्य, अहिंसा, शांती आणि सत्य यांचाही ह्या तत्वज्ञानात सामावेश आहे.
कार्ल मार्क्सने समाजवादाचा पुरस्कार केला. साम्यवादामूळे स्त्री-पुरुषांना त्यांचा विकास साधता येतो. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. दलित साहित्यातून आढळून येणारा नकार आणि विद्रोह म्हणजे मार्क्सच्या आदर्श समाज व्यवस्थेच्या कल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी चालविलेल्या संघर्षाची प्रधान सूत्रे होय. दलित साहित्यात दारिद्रय , भूक , समाजव्यवस्थे विरुध्द बंडाची भाषा येते,याचे मूळ कारण डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली मार्क्स विचार सरणी होय. म. फुलेंनीही मानसिक व सामाजिक गुलामगिरी विरुध्द बंड केले.समता, बंधुता यांचा पुरस्कार केला. दलित साहित्य हे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, वर्ण, जाती व्यवस्था यांना नकार देते. हिंदू परंपरा, वाईट चालीरीती , यांच्या विरुध्द बंड पुकारते हा विचार  डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीमधून आलेला आहे.
   त्यांनी दलितांना बलुतेदारी सोडून स्वातंत्र्य जीवन जगण्याचा उपदेश केला. मानव मुक्ती, स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार केला. दलितांच्या मनात आत्मसन्मान , आत्मविश्वास, आत्मावलंबन यांची जानीव निर्माण करुन दिली.जो धर्म वर्तमान समृद्ध करण्यासाठी माणसाला प्रोत्साहन देतो, जो त्याच्या मनात आशा पल्लवीत करतो व फुलवितो तोच खरा धर्म. लोकशाही, समाजवाद, आणि बुध्दविचारप्रणाली हाच आंबेडकरी विचारांचा गाभा आहे. दलित साहित्यातून डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात येते. समाजसुधारनेसाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक स्तरावर परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे.या साठी सम्यक क्रांती व्हावी लागते. ती घडवायची असेल तर विद्रोहाची गरज आहे. म्हणून दलित साहित्यात विद्रोह येतो.मानवतेसाठीचा हा विद्रोह आहे दलित साहित्य अज्ञान , दारिद्रय , पिळवणूक यांना नकार देते. वर्णव्यवस्थेमध्ये, जातीव्यवस्थेमध्ये मानवी मूल्यांचे अवमूल्यन होते. म्हणून या साहित्याने वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नाकारली आणि माणूस महान आहे हे सूत्र स्वीकारले. ते माणसाला केंद्रबिंदू मानते, त्याची बांधिलकी मणुष्यत्वाची प्रतिष्ठा मानणाऱ्या तत्वप्रणालीशी आहे.

   १९५८साली मुंबई येथे पहिले दलित साहित्य संमेलन भरले. त्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी 'हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे' असे विधान केले. याच संमेलनात मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात दलित लेखकांचे दलितांविषयीचे साहित्य यांचा दलित साहित्य म्हणून स्वतंत्र विभाग मानन्यात यावा असा ठराव पास करण्यात आला.

दलित शब्दाची व्युत्पत्ती

डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलित शब्दाची व्याख्या सर्वसमावेशक करणे फारसे योग्य ठरणार नाही. कारण दलित या शब्दामागे एक महत्वाची कल्पना आहे. हिंदू धर्माने आणि सामाजिक रुढींने ज्यांना आजवर बहिष्कृत मानले त्या माणसांना डाॕ. बाबासाहेबांच्या मुक्तीसंग्रामात नवी शक्ती लाभली आणि त्याला आपले मूल्यवान अनूभव व्यक्त करण्याची संधी लाभली. हा दलित वर्ग भारताचा पुराण, मूक, आणि अदृश्य पुरुष होता."
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात, "मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला , रेटलेला सामाजिक वर्ग म्हणजे दलित."
     डाॕ. भालचंद्र फडके दलित साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते सर्वसमावेशक शोशीत समाज दलित म्हणता येणार नाही कारण भारताततील हिंदू संस्कृती व रुढी परंपरेमूळे, वर्णव्यवस्थेमूळे ज्यांना सामाजिक प्रगतीत मागे ठेवले गेले यात दलित या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मपरिवर्तन असेल किंवा काळाराम मंदिर प्रवेश चळवळ, महाडचा सत्याग्रह ह्या मानवी मुक्ती संग्रामातून ज्यांना शक्ती मिळाली. हा वर्ग जागृत झाला ज्यांना आत्मभान मिळाले ते दलित.
  लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला वर्ग मग तो कोणी का असेना तो दलिता. पण याचा संदर्भही भारतीय समाज व्यवस्थे संदर्भातच घ्यावा लागेल.
जात्यात दळले गेलेले भरडलेले ते दळीत=दलित असाही अर्थ पाहवयास मिळतो. हे भरडणे दळणे भारतीय समाजव्यवस्थे संदर्भात घ्यावे लागते.
त्या संदर्भात लोकसाहित्याचे आभ्यासक डाॕ. प्रभाकर मांडे त्यांच्या 'दलित साहित्याचे निराळेपण' ह्या ग्रंथात सांगतात,"आपण येथे लक्षात घेतले पाहिजे की, दलित हा शब्द proletariat याचा अर्थ वर्ग वाचक किंवा केवळ जातीवाचकही नाही. दलित म्हणजे एक विशिष्ट सामाजिक स्थिती अनुभवित असलेला समूह किंवा समाजगट. भारतातील समाजव्यवस्थेत या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे."
तर डाॕ. गो. म. कुलकर्णी म्हणतात,"तळागाळात रुतून बसलेला सर्वच उपेक्षित समाज म्हणजे दलित समाज."
तर कवी नामदेव ढसाळ यांच्या मते, "दलित म्हणजे अनुसूचित जाती-जमाती, बौध्द, कष्टकरी जनता, कामगार, भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जमाती, आदिवासी इत्यादी."
     नामदेव ढसाळ दलित ह्या संकल्पनेत सर्व शोषीत कामगार, शेतकरी, भटक्या जमाती , आदिवासी यांचा समावेश करतात.

दलित साहित्यात दलितांच्या जीवनाचे चित्रण येते . परंतु दलितांच्या जीवनाचे चित्रण आले म्हणून ते दलित साहित्य होईल का? तर साहित्याचे वेगळेपण व्यक्त होणाऱ्या जानीवेत असते.

दलित जाणिवा
डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलितेत्तर लेखक आणि दलित लेखक यांच्या अनुभव घेण्याच्या शक्तीतच फरक आहे. दलित्तेतरांचा अनुभव संकल्पनात्मक आहे, तर दलित लेखकांचा अनुभव संवेदनात्मक असतो. एखिदे नाटक वाचणे आणि तेच नाटक प्रयोग रुपात पाहणे यात फरक असतोच . तसेच दलित लेखकाचे लेखन हा एक जीवंत अनुभव आहे.दलितेतर लेखकांनी जे लिहिले ते तितके उत्कट नसणे, जीवंत नसणे स्वाभाविकच आहे. म्हणून दलित साहित्यात आकारास येते, ते दलित लेखकाचे जग .हे जग त्यांचे स्वतःचे आहे. ते त्यांनी भोगलेले आहे. त्या जगातच ते वाढले आहेत.दलित साहित्यातील वेगळेपणा आमूक एका जातीतील लेखकाने लिहिले यात नसतो किंवा समूहाचे जीवन निवडले यातही नसतो किंवा विशिष्ट पोज घेऊन लिहिले यातही नसतो, तर तो दलितपणा माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करण्यात आहे, त्याला महान म्हणण्यात आहे. वंश, वर्ण व जातिश्रेष्ठत्वाला कडाडून विरोध करण्यात आहे."
या संदर्भात शरदचंद्र मुक्तीबोध म्हणतात, " दलित असणे व दलित जाणीव असणे हे भिन्न आहे. दलित जानीवेतून दलित जीवनविषयक जे वाड्•मय निर्माण होते ते, दलित वाड्•मय."
ह्या बाबत प्रा. कुमुद पावडे यांचे मत ही विचारात घेण्यासारखे आहे. त्या म्हणतात," माणुसकीच्या जगात माणसालाच प्रथम स्थान आसावं. पक्षी,मुंग्या, किडे, मासे, साप इत्यादी करुणेचे विषय दलितांच्या नंतर असावेत. माणुसकीची जानीव विसरलेल्या प्रेरणा बेगडी व हस्यास्पद असतात."

दलित साहित्याचे स्वरुप: बांधिलकी

दुःखाची तीव्रता कितीही असली तरी दलित साहित्य आशावादी आहे. कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या सखीला केलेली मागणी याच उत्कट आशावादातून जन्म घेते.ते म्हणतात -
"याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
वेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजेच."

कुणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये. माणसाने माणसाला समानतेने वागवावे न्यायाने वागवावे. हिच ठाम अपेक्षा दलित साहित्यात प्रकट होते. नामदेव ढसाळ म्हणतात -
"माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्दवस्त करुन घ्यावे
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही
गुलाम करु नये लुटू नये
काळा गोरा म्हणू नये, तू ब्राम्हण तू क्षत्रिय
तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
नाती न मानण्याचा
आय भैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी
मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे.
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करडून खावा, माणसावरच सूक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने."

दया पवार म्हणतात -
"हे महाकवे ,
तुला महाकवी तरी कसे म्हणावे
हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा
एक जरी श्लोक तू रचला असतास....
....तर तुझे नाव काळजावर कोरुन ठेवले असते.
वरील काव्य रामायण महाकाव्य लिहीणा-या वाल्मिकी ऋषी बद्दल आहे.

अर्जुन डांगळे म्हणतात -
"जगत आहोत आम्ही इथे
जगावे लागते म्हणून
तर असे हे जिणे जगत असताना
ही महानगरी आमच्यावर खूष झाली
'बेकार' नावाची तिची प्रियतम
पदवी आम्हा बहाल केली."
वरील ओळीत सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कवीने मांडला आहे.

गावकुसाबाहेरच्या माणसांच्या वाट्याला आलेले दुःख वामन निंबाळकर व्यक्त करतात.
"या गावकुसाबाहेरचे वाळलेले
चिरडलेले जीवन,
विषय झालाच नाही ,
तुमच्या कवितेचा."

श्री. ज. वि. पवार यांच्या काव्यात डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
"तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडाविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास
उभा बहिष्कृत भारत

पण पवारांच्या कवितेला मार्क्स नको आहे आंबेडकर हवे आहेत ते म्हणतात -
"तू म्हणतोयस मार्क्स हा दवा आहे
मी म्हणतोय ती एक दारु आहे
ही जातीयता फोड. हे बांध फोड
बांधाबांधातील पाणी घुसू दे,
तुझ्या बांधात, माझ्या बांधात."

'दिशा' या कविता संग्रहात ज्योती लांजेवार यांनी स्त्री मनाचे चित्र रेखाटले आहे. स्त्रीयांवर होत असलेल्या आत्याचारांबाबत त्या म्हणतात -
"हे कृष्णा ...तुझ्या राज्यात
आया बहिणींवर अत्याचार
अन् तू डोळे मिटावेसे असे पार...
अरे, अंगभर वस्त्रे पुरवू नकोस
पण वस्त्र ओढणारे ते हात
मूळापासून छाटून तरी टाक!"

वरील सर्व काव्य लेखन पाहता हे लक्षात येते, दलित साहित्यात विद्रोह आहे पण तो माणुसकीचा हक्क मागण्यासाठी. दलित साहित्य हि एक चळवळ आहे. त्या चळवळीतून जो संस्कृती, वर्णव्यवस्था जातीयतेने हक्क हिरावून घेतलेला आहे. तो माणुसपणाचा हक्क सनदशीर मार्गाने मागण्यासाठी दलित साहित्य चळवळही हातभार लावते. सामाजिक बांधिलकी हा विद्रोह जपतो. पण आजही हे भेद आणि माणुसकी संपली आहे का असा प्रश्न मनात घर करुन जातो.

लेखन/संकलन
#सोमनाथ_पुरी

भीम जयंती

भीम सूर्य सोशीतांचा, 
भीम दवा दुःखीतांचा
भीम प्रेरणा साहित्याचा
भीम निर्माता घटनेचा

आत्मभान विसरलेल्या,
भीम तळातील मणुष्याचा.
भीम उद्गाता स्वातंत्र्याचा 
भीम समतेचा व न्यायाचा

जेथे सावट अज्ञानाचे
भीम सूर्य तो ज्ञानाचा
जेथे दगडी देव पूज्य 
तेथे ईश्वर माणसाचा

व्यक्ती पूजा, अंधभक्ती
भीम काळ थोतांडाचा
आत्मसन्मान विसरलेल्या
भीम आत्मभान मणुष्याचा

बुध्दीप्रामाण्य धर्म जाणनारा
भीम विचार गौतमांचा
फुले, शाहू, आशोकाचा
भीम स्तंभ लोकशाहीचा

-सोमनाथ पुरी

स्वातंत्र्य शब्दांचे

स्वातंत्र्य शब्दांचे

किती अश्रू ढळतात ख-या प्रेमात ?
तरीही मने झुरतात गुलाबी आठवात

माहित असते का अगोदर कुणाला
केंव्हा प्रेम होईल वेड्या मनाला 

शब्दांना असावे स्वातंत्र्य फुलण्याचे
मनाला का घालावे बंधन प्रेमाचे

प्रेम असावे समानतेच्या तत्वाचे
नसावेत प्रेमातही भेद उच्चनिचतेचे

खुलावेत मने दोघाचेही आनंदाने
सर्व खेद विसरून जवळ यावे मनाने

-सोमनाथ पुरी

रविवार, १२ एप्रिल, २०२०

स्त्रीवादी लेख

      ज्योती हनुमंत भारती यांच्या कवितेतील स्त्रीवाद

कविता हे देखील जीवितयात्रेतील पाथेय आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. आपण जे अनुभविले त्याचा आविष्कार कवितेतून करताना एक तृप्तता वाटते. स्त्रीने आपली सुखदुःखे, आशा-आकांक्षा व्यक्त केल्या त्या प्रथम कवितेतून. साने गुरुजी म्हणत की, स्त्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतला, तो कवितेतून, कविता ही तिची सखी. जात्यावर दळताना, कांडताना, झोपाळ्यावर झोके घेताना कविता हीच तिची सहचारी होती, तिचे विश्व होते, चूल आणि मूल, माहेर आणि सासर, या विश्वात तिच्या वाट्याला कधी वेदना आल्या, कधी श्रावण सरीचे सुख आले. जे वाट्याला आले ते तिने कवितेच्या करंड्यात जपले. ही 'अपौरुषेय' कविता म्हणजे मराठी कवितेचे धन. एका मर्यादित विश्वात वावरत असणाऱ्या स्त्रीची कविता चित्त वेधून घेते. याचे कारण तिचा जन्म तिच्या जगण्यातून झालेला आहे. तिच्या विविध भावस्थितीचे चित्र या कवितेतून उमटत गेलेले आहे. लग्न, मुंज, बारसे, डोहाळे अगर नागपंचमी, गौरी-गणपती, नवरात्र इ. सण व उत्सवांच्या निमित्ताने स्त्रीचे दुथडी भरून आलेले मन कवितेतूनच गोचर होते.
  प्राचीन मराठी कवितेची वाटचाल महानूभाव पंथ, वारकरी संप्रदाय ह्या मध्ये पहावयास मिळते. मग तिथे महदंबा गोविंदप्रभूच्या भक्तित तल्लीन होऊन 'धवळे' रचते, तर जनाबाई विठ्ठलासाठी अभंग रचना करते.
  असा स्त्रीयांनी लिहीलेल्या काव्याचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासून पहावयास मिळतो. तो अध्यात्माच्या रूपात.
  कवितेची आणि स्त्री साहीत्य लेखनाची नाळ जोडणे ही पुरुषप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. स्त्रीयांनी नाजुक कोमल भावच काव्यातुन का जोपासावेत? असा आधुनिक स्त्रीवादी साहीत्य समीक्षेला पडलेला एक प्रश्न आहे. ह्यातच स्त्रियांचे भाव विश्व गुरफुटन टाकणे स्त्री साहित्याकडे मनोरंजक म्हणून पाहणे ह्या पलिकडे वाचक व समीक्षकाची दृष्टीच जात नाही.
कविता लिहीणा-या कवींनी ही बंधने झुगारून द्यायला पाहिजेत.
      पुरुषप्रधान संस्कृतीत स्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. हाच दृष्टिकोन स्त्री साहित्यातुन पाहवयास मिळतो. ह्या बाबत एडवीन आर्डनर म्हणतात, 'गुढ, अप्रकाशित, अंधाऱ्या अती खासगी विभागातून (wild zone) तिची कलात्मक निर्मिती होणे आवश्यक आहे. यातच तिचे खरे अस्तित्व असते. तेथिल भाषा, तेथून निर्माण होणारी प्रतिमा यांनीच खरी स्त्री साहित्याची वीण बांधली गेली पाहिजे. आपल्या साहित्यामध्ये अस्सलपणा पाहिजे असेल तर wild zone कडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही.'(संदर्भः साहित्य दर्शन -डाॕ. दिलीप गायकवाड )

ज्योती हनुमंत भारती ह्यांच्या काव्यातील स्त्रीवाद

ज्योती भारती ह्या कवयित्री मराठी कविता तसेच हिंदी भाषेतही काव्य लेखन करतात. त्यांच्या काव्य लेखना मागील प्रेरणा  ज्ञानपीठ विजेत्या पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम असल्याचे सांगतात. शालेय जीवनापासूनच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला.
त्यांच्या मराठी कविता वाचकाच्या हृदयाला भीडतात.
  त्यांच्या कवितांचा विषय प्रामुख्याने प्रेम भाव असला तरी त्यांच्या कवितातून सामाजिक जानीवही येते. पौराणिक राधा-कृष्ण, सीता, दुर्गा, चंडी, शिव अशा प्रतिकातून त्यांची कविता व्यक्त होत जाते.
      राधाकृष्णातील आध्यात्मिक पातळीवरील समर्पन भाव त्यांच्या काव्यात पाहवयास मिळतो. त्या त्यांच्या एका काव्यात म्हणतात -

'राधा झाली कृष्ण
कृष्ण झाला राधा
कोणी कशी वर्णावी
ही सावळ्याची बाधा'
   अशा प्रकारे राधाकृष्णातील अद्वैत भावाचा अपूर्व संगम घेऊन त्यांची प्रेम कविता अवतरते. अशा प्रकारचा अध्यात्मिक संदर्भ देणारी कविता इंदीरा संतांचीही पहावयास मिळते. येथे इंदीरा संतांशी तुलना करण्याचे कारण आध्यात्मिक प्रतिमांच्या साह्याने कविता लेखन करुन प्रथम इंदीरा संतांनी पारंपरिक काव्याचे वर्तुळ भेदले होते. तीच पुनरावृत्ती आजही होताना पाहवयास मिळते. त्या म्हणतात,

'अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकूळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ'
- इंदीरा संत(मृगजळ)
  इंदीरा संत सांगतात 'मी मृगजळ ह्या काव्य संग्रहात मुक्तछंदाचा अधिक आश्रय घेतला, (छंदाचे हे वर्तुळ अगोदरच मुक्तेश्वराने भेदले होते.) कारण जशा भाव जानीवा संमिश्र, क्षोभकारक व सूक्ष्म होत जातील, तशी त्यांना ओवी व पादाकुलक ही वृत्ते मानवत नाहीत, असे मला दिसून आले.'
       ज्योती भारती यांच्या काव्यातही वृत्त व छंदाचा जास्त वापर होत नाही. म्हणून ती काव्यलेखनाची काही मर्यादा नाही तर जिथे भावना तीव्र असतात तिथे वृत्ताच्या नियमांची गरजच काय? त्यांच्या काव्यातील भावच श्रेष्ठ ठरतात. अस्सल काव्याचा दर्जा त्या काव्याची वृत्तीच त्यांना बहाल करते.
    दुसरी महत्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे परंपरेनूसार स्त्रियांच्या भावभावना जशाचतशा प्रकट करणे हे सुध्दा पुरुषी वर्चस्व असणाऱ्या समाजात धाडसाचे काम आहे. ह्या बाबतीत लक्ष्मी बाई टिळकांचे अनुभव
    एकदा त्यांनी कविता लिहिली व त्यांचे पति रागावतील म्हणून त्यांनी कागद चोळामोळा करून टाकला. टिळकांना वाटले ही आपल्या माघारी माहेरी पत्र लिहीत आहे पण टिळकांना ती कविता सापडली. १८९५ मध्ये टिळकांनी धर्मांतर केले. विचित्र परिस्थितीने घेरलेले त्यांचे मन कवितेला 'दुतिका' म्हणून संबोधू लागले. पति विरहामूळे एकटेपण आलेल्या लक्ष्मीबाईंचा विरहात कविता हाच विसावा होता.
     ज्योती भारती यांच्या कविता त्यामानाने स्त्री मनातील भाव निर्भिडपणे व्यक्त करतात. हे ही त्यांचे सामर्थ्य स्थानच आहे.
  त्यांची सखीला उद्देशून लिहीलेली एक कविता स्त्रिवादी साहित्याचा जणू आत्माच आहे. ती कविता 'नारी तू जगतेस का?' ह्या काव्यात म्हणतात -

'स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
रोज निरंतर झूलतेस का?
लावून उपाध्या नात्यांच्या
बाईपणात मिरवतेस का?
आब राखत चालतानाही
नारी तू तुझी उरतेस का?
खरंच तू जगतेस का?'
ह्या ओळी सखीलाच नाही तर पुरुषांनाही विचार करण्यास प्रवृत्त करतात. जगणे म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, बंगला, गाडी, सुंदर कपडे, मेकप म्हणजे जगणे का? पुरुषसत्ताक कुटुंब पध्दतीमध्ये पतिला ईश्वर मानले जाते, मग तो कसा का असेना. ह्यालाच संस्कार आणि संस्कृती म्हणतात मग ती ही कशी का असेना. पण स्त्रिवादी साहित्याला ह्या मर्यादा , वर्तुळे भेदण्याची गरज आहे. स्त्रियांच्या मनातील हळूवार भावभावनांचा आजही सुशिक्षित घरातही विचार केला जात नाही. एवढेच नाही तर स्त्रीच संस्काराचा बुरखा घेऊन ह्या भावना लपवत असतात.
  तेच साहित्याच्या बाबतही लागू होते. एका हाडा मासाच्या शरीरात श्वास घेणे व सोडणे एवढीच क्रिया चालू राहते. स्वप्ने पाहण्यावरही पाप पुण्याचे बंधन येते.
  कवयित्री म्हणतात केंव्हा ही स्त्री आई असते , केंव्हा बहिण, केंव्हा सून, एवढेच नाही तर प्रेयसी सुध्दा हे सर्व बंधनाचे नाते घेऊन ती जीवनाचा गाडा ओढत असते. नात्यांचा सांस्कृतिक धर्म पाळीत असते पण जगत नसते. नेमक्या ह्याच प्रश्नाला कवयित्री येथे वाचा फोडतात. हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.
पुढे त्या म्हणतात -

स्वत्व तुझं शोधताना नव्याने
एखाद्या वर्तुळा बाहेर पडतेस का?
वारसा घेतेस अजूनही सीतेचा
पण मनात राधा जपतेस का?'

  कवयित्री सखीला स्वत्व शोधताना एखाद्या वर्तुळाबाहेर पडतेस का? असा प्रश्न करतात. मग ही वर्तुळे कुठली आणि कोणती? तर संस्कृती, संस्कार आपण ज्यांना म्हणतो त्यात दोष निर्माण झाल्यामूळे तिच आपली साखळदंड ठरतात. दुसरा मुद्दा आहे साहित्याच्या बाबतीत स्त्रीयांची कविता त्याच पारंपरिक वर्तुळामध्ये घुटमळत राहते. हे वर्तुळ भेदण्याची क्षमता आधुनिक काळात निर्माण झाली पाहिजे.
  कवयित्री सौ. पद्मा गोळे त्यांच्या नीहार ह्या काव्यसंग्रहात 'मी माणूस' कवितेत म्हणतात.

"स्री देवी हे तर खोटं
स्त्री सखी हे ही खोटं
स्त्री सुंदर चलनी हुंडी
स्त्री म्हणजे नुसती कुंडी
स्त्री म्हणजे केवळ मांस
शिका-याच्या हातात फास (नीहार पृ. ३५)
बाकी सारे मोहक भास"

स्त्री ही माणूस आहे आणि ती माणूस म्हणूनच जगणार हा विचार पद्माताईंनी आत्मविश्वासाने मांडला.
स्त्रीला संसारात स्थान काय? ती पतिची प्रिय सखी की शोभेची वस्तू ? प्रीती विसरणा-या प्रियकराला ती सांगते ः
"विसरलास तू अन मी झाले
रे केवळ गृह मंदिरभूषा."(नीहार पृ. २५)
   
  अशा प्रकारच्या विषयावर लेखन फार कमी आढळते. स्त्री जीवनात ही वैफल्य आहेत तर साहित्यातही निर्भिडपणे यायला पाहिजेत. असे वर्तुळ भेदून कविता पुढे गेली पाहिजे. ज्योती भारती यांच्या कवितेत हा उपदेश येतो.
    त्या स्त्रीला म्हणतात, तू सीतेचे पतिव्रत्य जपतेस पण कधी काळी तुझ्या मनात प्रियकराबद्दल असक्ती निर्माण  झाली तर ती 'राधा' राधेचा भाव मूक्तपणे जपतेस का? का तुला ते संस्कारामूळे पाप, चुकीचे वाटते?असे प्रश्न वरील ओळीतून केले आहेत.
     कविता आणि स्त्री हे नाते पुरुष प्रधान संस्कृतीने मोठ्या सीताफिने जोडले आहे. आणि स्त्रिया ही हेच वर्तुळ आनंदाने गिरवताना दिसतात. ह्या वर्तुळाला भेदण्याचे सामर्थ्य साहित्यात येणे आवश्यक आहे.

ज्योती भारती पुढे म्हणतात,
लावून झापडं करिअरची
पुरूषी अहं मिरवतेस का?
साज नवाच चढवून तोंडावर
आतली रंभा पुसतेस का?

आधुनिक स्त्री ध्येय, करिअरच्या नावाखाली पुरुष होतेय का? ही सुध्दा भिती येथे कवयित्री व्यक्त करतात. ही तर भविष्याची चाहूल आहे. कदाचित वर्तमान सुध्दा असेल. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी नव्हत्या त्यावेळेस त्या पुरुषप्रधान संस्कृतीत गुलाम होत्या किंवा आहेत. पण आर्थिक स्वावलंबन आल्यास परत ती पुरुषांवर वर्चस्व गाजवायला पाहतेय का? असाही प्रश्न त्यांची कविता विचारते. स्त्री-पुरुष समानता किंवा स्त्रीवाद हा पुरुष विरोधी नाही तर स्त्रियांचे दास्यत्व झुगारुन नवी समाज रचना अस्तित्वात आणन्यासाठीचा आहे. तेथे स्त्री पुरुष सर्व पातळ्यांवर समान असतील.
    पुढच्या ओळीत परत त्या म्हणतात, नवा साज चढवून श्रृंगार करुन. हे सौंदर्य केवळ बाह्य दिखाव्यासाठी करतेस का खरंच तुझ्या मनातील भावसौंदर्यही तु जपतेस? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने मिळवावे. त्यांची कविता प्रश्न विचारुन मनात घर करते.
सीता, राधा, रंभा हे पौराणिक संदर्भ देण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्व आहे.

आईपणाने सर्जक होताना
वेणा सोसत लढतेस का?
दुनिये भोवती फिरता फिरता
स्वतःलाही शोधतेस का?

  कवयित्री म्हणतात, तुला निसर्गाने आई होण्याचे वरदान दिलेय. आई होताना तुझी कुस सर्जनशीलता दाखवते पण प्रसुतीच्या वेदना सहन करतेस तशा संसारातील वेदनाही आईपणाने सहन करतेस. एवढा त्याग करुनही कधी दुनियाही तू पाहतेस पण कधी अंतर्मुख होऊन तुझे स्वतःचे सुख कशात आहे हे शोधतेस का?

    थोडक्यात सांगायचे झाले तर स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टीकोणातून सुरुवातीला लेखन करणाऱ्या स्त्रियांनी अध्यात्माची कास धरली पुढे स्वातंत्र्याअगोदर व नंतर कविता अंतर्मुख होऊन तिने स्त्री मनातील विविध भावनांचे पदर उलगडायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रेमानुभवाचे तसेच मनातील कोलाहल जी स्त्रित्वामूळे निर्माण झाली ती मुक्त पणे कवितेत व्यक्त केली इंदीरा संत व पद्मा गोळे ह्या कवयित्रींच्या काव्यात ती पाहवयास मिळते. सध्याच्या वर्तमानकाळात कविता अधिक स्पष्टपणे भाव मांडते. हे ज्योती हनुमंत भारती यांच्या प्रातिनिधीक काव्यात दिसून येते.
     ह्या ही पुढे जाऊन सध्याचे वर्तुळही कवितेला भेदण्याची गरज आहे.

म्हणून म्हणावेसे वाटते,

हम जींदगी लिखते है कलमसे
इसलीऐ के बंदगी खत्म हो जींदगीसे

#सोमनाथ_पुरी

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

अभंग रचनाबंध

अभंग रचनाबंध

पहील्या ओळीत चार अक्षरे 
दुसऱ्या ओळीत चार अक्षरे व यमक
तिसऱ्या ओळीत चार अक्षरे व यमक
चौथ्या ओळीत चार अक्षरे 

संकलनः सोमनाथ पुरी

#अभंग

संध्या समयीचे
रूप मनोहर
नभ समांतर
वसुंधरेला

प्रकाशाचा दिवा
मंद ह्या संध्येला
अग्नी त्या वातीला
द्यावा आता

दारी वृंदावन
कृष्ण तो सरसं
अतुर तुळसं
अंगणात 

चुल ही पेटली
सर्व घरोघरी
दरवळ भारी
भूक पोटी

तान्हा ही रडतो
माता ती कामात
पिता तो रानात
गावोगावी

#सोमनाथ_पुरी

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

काय अजून हवय मला...



काय हवय अजून मला, भरपूर दिलेस तू
जगण्याला अर्थच नव्हता तो अर्थ दिलास तू

नैराश्येच्या पोकळीत वसलो होतो मी
अवकाशाच्या पोकळीतील स्वर्ग दिलास तू

गर्दीच्या दुनियादारीत एकटाच उभा मी
दर्दी मनाला , विश्वासाचा हात दिलास तू

दुःखात जगते जग सारे, थोडे साहतो मी
वेदनेच्या अश्रूतूनही, काव्य भाव दिलास तू

काळोखाच्या गर्भात जगतो आपण सर्व सारे
अंधारलेल्या रात्रीला,ज्योती प्रकाश दिलास तू

©सोमनाथ पुरी

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

फुलले रे क्षण माझे ...

फुलले रे क्षण माझे..

शिंपल्याच्या मोत्यातून 
भाव शब्दांत कोरले रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

गझलेची झुळूक हलकीशी 
मनोमन भरली रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

काव्यातुन शब्दांमधे
प्रीत दोघांनी पेरली रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

वसंतात गुलाब प्रीतीचा
सुगंधात बहरला रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

किस्से राधेच्या प्रीतीचे
वृंदावनी रंगले रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

चैत्रातला पळसही 
अंगणी बहरला रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

©सोमनाथ पुरी

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

निरागस

निरागस असतात
शुध्दशब्द कलेतले
शब्दांवर प्रेम होते
भाव येता मनातले

निरागस निसर्ग तो
निरागस प्रीत असे
मोहनाला घातलेली
राधीकेने साद भासे

जेंव्हा शीळ ओळखीची
येते सख्याच्या ती कानी
होतो व्याकूळ तो सखा 
चिंबवण्या प्रीत जुनी

संध्या समयी राधाही
शहारते रोमातून
आळवीते प्रितगीत
वृंदावनी मनातून 

मोर पिस हलकासा
स्पर्श तनालाही होतो
व्याकूळल्या त्या मनाला
स्पर्श वसंत तो देतो

-सोमनाथ पुरी

बुधवार, १ एप्रिल, २०२०

शेल चारोळी


*शेल काव्य प्रकार*- आपण शिकूयात काहीसा कटेकोर नियम व मर्यादित वर्ण असल्यामुळे रचना लिहिताना मजा येते. शेल काव्य प्रकार चारोळी करताना शब्दाची निवड करतेवेळी शब्द वा वर्णांचे भान आवश्यक  काव्य-प्रकार सहज प्रकारे लिहिता येतो..

या काव्य-प्रकाराचे नियम खूप सोपे आहेत व सहजच चारोळ्या करू शकता. 

शेल रचनेचे नियम

१ प्रत्येक ओळीत ( म्हणजे चारोळीत ) वर्णांची संख्या समान असावी ( चारही ओळीत सारखे वर्ण अक्षरे )

पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द व दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द समान असावा.. अशाप्रकारेच तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द व चौथ्या ओळीत पहिल्यांदा तो शब्द असावा

चारोळी नियमाप्रमाणे चारोळीत दुसऱ्या ओळीचे व चौथ्या ओळीचे यमक असावे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*शेल चारोळी*             
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*किती आठवणी साठवतो*
*साठवतो सूर्य मावळता*
*दररोज विलयाला जातो*
*जातो विसरुन उगवता*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵